*हातानेच पडतेय शाळेची भिंत; आगळीतील शाळेच्या बी बांधकामाची पोलखोल*
मूल – पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आगळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकामावर निकृष्ट दर्जाच्या कामाचे आरोप होत असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सुमारे 19 लाख रुपये खर्चून शाळेची इमारत उभारण्यात येत आहे. मात्र बांधकामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, इमारतीचे बांधकाम सुरू झाल्यापासून बांधकामाला आवश्यक त्या प्रमाणात पाणी मारण्यात आलेले नाही. सिमेंट काँक्रीट आणि विटांच्या बांधकामाला योग्य प्रकारे क्युरिंग न झाल्याने भिंती कमकुवत झाल्या असून काही ठिकाणी हात लावताच बांधकामाचा भाग तुटून पडत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच गावचे सरपंच यांनी अनेक वेळा संबंधित कंत्राटदाराचे लक्ष या बाबीकडे वेधले. मात्र कामातील त्रुटी दूर करण्याऐवजी कंत्राटदाराकडून उद्धटपणे वागणूक दिली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाकडे जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, मूल येथील संबंधित अभियंत्यांचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. कामाची नियमित पाहणी होत नसल्याने निकृष्ट दर्जाचे बांधकाम सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. काही नागरिकांनी अर्थपूर्ण व्यवहारातून कंत्राटदाराला पाठीशी घातले जात असल्याचाही संशय व्यक्त केला आहे.
शाळेची इमारत ही विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित बाब असल्याने बांधकामाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच दर्जेदार कामाची खात्री करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक, पालक व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
*शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरू झाल्यापासून कंत्राटदाराने एकदाही पाणी मारले नाही.त्यामुळे इमारतीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे.मी स्वतः कामावर जाऊन इमारतीला हात मारले असता इमारतीची भिंत कोसळत होती.याची माहिती संबंधित अभियंत्याला दिली आहे.: जीवन लेनगुरे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती आगडी*
सुरवातीपासूनच इमारतीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे.कंत्राटदार मुजोरीने बांधकाम करत आहे.याकडे संबंधित अभियंत्याचे दुर्लक्ष होत असून भविष्यात इमारत कोसळून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो.याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कारवाई करावी: दर्शना किन्नाके प्रशासक जानाळा
इमारतीचा जो भाग निकृष्ट आहे ते पाडण्यासाठी कंत्राटदाराला पत्र दिले आहे.:देव बघेले उपविभागी
य अभियंता मूल




