*महामार्ग की भ्रष्टाचाराचा मार्ग? निकृष्ट कामाविरोधात काँग्रेसचे ९ जूनला चक्काजाम आंदोलन*
मूल – जानाळा ते पोंभूर्णा राज्य महामार्गावर सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या बांधकामातील कथित अनियमितता, निकृष्ट दर्जा आणि नागरिकांच्या समस्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षाविरोधात काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ९ जून रोजी कांतापेठ येथे रास्ता रोको व चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक सरपंच व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
हायब्रीड अॅन्युइटी मॉडेलअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून जानाळा ते पोंभूर्णा राज्य महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. मागील वर्षभरापासून हे काम सुरू असले तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणारे नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कामाच्या ठिकाणी आवश्यक माहिती फलक नसल्याने पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच टोलेवाही रेल्वे स्टेशन दरम्यान पुलाचे बांधकाम अद्याप अपूर्ण असून त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. जानाळा चिरोली मार्गावरील पाणीपुरवठा पाइपलाइन तुटल्याने काही गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. रस्त्याची उंची वाढल्याने अनेक घरे खालच्या स्तरावर गेली असून येत्या पावसाळ्यात घरांमध्ये पावसाचे व गटाराचे पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
टोलवाही व चिरोली परिसरातील नाली बांधकाम अर्धवट सोडण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. शेतातून काढलेल्या वळण मार्गांमुळे अनेक लहान-मोठे अपघात घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी मुरूम टाकण्याऐवजी मातीचा वापर करण्यात आल्याने रस्त्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
या सर्व बाबींवर २१ एप्रिल रोजी नागपूर येथील कार्यकारी अभियानात यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही परिस्थितीत कोणतीही सुधारणा न झाल्याने काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी व कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
*कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन बांधकामात होत असलेली नियमता त्यांच्या लक्षात आणून दिली.नाली बांधकामामुळे घाण पाणी पावसाळ्यात घरात शिरण्याची शक्यता असल्याची माहिती दिली.त्यांनी आठ दिवसात तुमच्या समस्या सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले.मात्र अजूनही समस्या जैसे थे आहेत.त्यामुळे नागरिकांना घेऊन ९ तारखेला चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे.:दर्शना किन्नाके सरपंच जानाळा*




