*नागपूर जिल्ह्यातील औद्योगिक व आर्थिक विकासासाठी कलमेश्वर ते बुटीबोरी रेल्वे कॉरिडॉर निर्माण केल्यास सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल*
*काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष किशोर कन्हेरे यांनी ना.नितीन गडकरी व. ना.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली मागणी*
0 नागपूर जिल्हा हा विदर्भातील औद्योगिक, व्यापारी तसेच वाहतूक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा जिल्हा असून येणाऱ्या काळात राज्याच्या औद्योगिक प्रगतीमध्ये या विभागाची भूमिका अधिक निर्णायक ठरणार आहे. राज्य शासनाने उद्योगवृद्धीसाठी राबविलेल्या विविध योजनांमुळे नागपूर परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कलमेश्वर ते बुटीबोरी रेल्वे कॉरिडॉर उभारणे ही काळाची गरज बनली आहे.
सदर रेल्वे कॉरिडॉरमुळे नागपूर जिल्ह्यातील कलमेश्वर, हिंगणा, गोंडखैरी तसेच बुटीबोरी एमआयडीसी क्षेत्रांची थेट आणि प्रभावी रेल्वे जोडणी निर्माण होईल. विद्यमान परिस्थितीत औद्योगिक मालवाहतूक प्रामुख्याने रस्ते वाहतुकीवर अवलंबून असल्याने उद्योगांना वाहतूक खर्च, वेळेचा विलंब तसेच लॉजेस्टिक व्यवस्थापनाच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेल्वे कॉरिडॉरमुळे मालवाहतुकीसाठी पर्यायी, जलद आणि कमी खर्चिक सुविधा उपलब्ध होऊन उद्योगांना मोठा दिलासा मिळेल.
तसेच महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गाशी या रेल्वे कॉरिडॉरची जोडणी झाल्यास नागपूर जिल्हा हा देशातील प्रमुख औद्योगिक व लॉजेस्टिक केंद्र म्हणून विकसित होण्यास मोठी मदत होईल. बुटीबोरी, कलमेश्वर आणि गोंडखैरी येथे प्रस्तावित लॉजेस्टिक हब, वेअरहाऊसिंग प्रकल्प, ड्राय पोर्ट, कोल्ड स्टोरेज तसेच निर्यात केंद्रांच्या उभारणीस गती मिळेल. यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुंतवणूकदारांना या परिसरात उद्योग स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
*या रेल्वे कॉरिडॉरमुळे खालीलप्रमाणे महत्त्वाचे फायदे होऊ शकतात* बुटीबोरी, हिंगणा व कलमेश्वर औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना थेट रेल्वे सुविधा उपलब्ध होईल. औद्योगिक मालवाहतुकीचा खर्च कमी होऊन उद्योगांची स्पर्धात्मक क्षमता वाढेल. नवीन उद्योग, वेअरहाऊस, लॉजेस्टिक पार्क आणि व्यापार केंद्र उभारणीस चालना मिळेल. हजारो युवकांना स्थानिक स्तरावर रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. नागपूर जिल्ह्याचा औद्योगिक आणि आर्थिक विकास अधिक वेगाने होईल. रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होऊन प्रदूषणात घट होण्यास मदत होईल. समृद्धी महामार्ग, एमआयडीसी आणि रेल्वे नेटवर्क यांची एकात्मिक जोडणी निर्माण होईल. नागपूर मेट्रोचे जाळे भविष्यात कलमेश्वर व गोंडखैरीपर्यंत विस्तारण्यासही मदत होऊ शकते.
नागपूर हे देशाच्या मध्यभागी स्थित असल्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील मालवाहतूक, कंटेनर ट्रान्सपोर्ट, लॉजेस्टिक साखळी तसेच औद्योगिक गुंतवणुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे केंद्र ठरत आहे. केंद्र व राज्य शासनाने नागपूरला “फ्युचर ग्रोथ सेंटर” म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याने या रेल्वे कॉरिडॉरची उभारणी ही दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे.
तरी आपण कलमेश्वर ते बुटीबोरी रेल्वे कॉरिडॉरच्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करावा, असे लेखी पत्राद्वारे मागणीसह नम्र विनंती केली आहे.





