मूल – चंद्रपूर-मूल महामार्गावरील जानाळा गावाजवळ रविवारी (दि. ५) दुपारी ११:३० वाजताच्या सुमारास ‘मामा’ वाघाने हल्ला करून एका गाईला ठार केले. त्यानंतर चक्क महामार्गावरून जंगलाच्या दिशेने तिला ओढत नेले. ही घटना वनपरिक्षेत्र चिचपल्ली बीट, जानाळा कक्ष क्रमांक ७१५ जवळ घडली असून अजूनही चंद्रपूर रस्त्यावर वाघाची दहशत सुरूच आहे.
मूल तालुक्यातील व वनपरिक्षेत्र चिचपल्ली (प्रादेशिक) विभागात येणाऱ्या आगडी गावातील शेतकरी राजेंद्र वाढई यांची गाय रस्त्यालगत चरत असताना वाघाने अचानक झडप घातली. या हल्ल्यात गाईचा जागीच मृत्यू झाला.
ताडोबा वनपरिक्षेत्रातील हा ‘मामा’ वाघ परिसरातील सर्वांत मोठा असल्याचे सांगितले जाते. घटनेनंतर महामार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी वाघाला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. त्यामुळे काही काळ वाहनांचा रांगा लागल्या होत्या. या घटनेमुळे शेतकरी राजेंद्र वाढई यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने तातडीने उपाययोजना केली जात आहे. करावी, शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांकडून केली आहे.
वनविभागाचा पहारा
सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास वाघाने गायीवर हल्ला करून तिची शिकार केल्याचा व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. नागरिकांची वाढती गर्दी पाहता कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी चिचपल्लीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती महेश्कर यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक निमकर व : वनकर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बंदोबस्त केला. विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. फोटो-व्हिडीओ काढण्याच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.




