*टिळक भवन, मुंबई येथे ओबीसी समाजातील प्रज्ञावंतांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे सत्कार*
मूल – क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित “सत्यशोधक चळवळ” या विषयावरील परिसंवाद तसेच ओबीसी समाजातील प्रज्ञावंतांचा सत्कार सोहळा आज टिळक भवन, मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
या परिसंवादात सत्यशोधक चळवळीचे विचार, सामाजिक समता, शिक्षण, संविधानिक मूल्ये आणि ओबीसी समाजाच्या सक्षमीकरणावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील ओबीसी समाजातील प्रज्ञावंतांचा त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक योगदानाबद्दल यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले की, ओबीसी चळवळ ही कोणत्याही समाजाच्या विरोधातील नसून सामाजिक न्याय, समान प्रतिनिधित्व आणि संविधानिक भागीदारीसाठीची चळवळ आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मांडलेल्या “जितनी जिसकी संख्या भारी, उतनी उसकी भागीदारी” या सामाजिक न्यायाच्या भूमिकेला काँग्रेस पक्ष कटिबद्ध असून महात्मा फुले यांच्या समता, शिक्षण आणि सत्यशोधक विचारांचा वारसा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार काँग्रेसने केला आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री. किशोर कन्हेरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, गेली २५ वर्षे ते ओबीसी चळवळीत कार्यरत आहेत. ११ एप्रिल रोजी महात्मा फुले जयंतीनिमित्त फुले वाडा येथे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेल्या भेटीनंतर फुले-शाहू-आंबेडकर विचारांना नवसंजीवनी देण्याचे काम सुरू झाले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सामाजिक न्यायाची लढाई लढत असून, काँग्रेसपासून दूर गेलेल्या समाजघटकांना प्रतिनिधित्व देऊन पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्याचा पक्षाचा निर्धार आहे. आगामी काळात फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री. किशोर कन्हेरे, श्री. अनंत मोहोड, वरिष्ठ प्रवक्ते श्री. अतुल लोंढे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
याप्रसंगी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष श्री. भानुदास माळी, सौ. भाग्यश्री भोईर, श्री. दिगंबर राऊळ, श्री. अशोक खलाने, श्री. अभिजित राऊत, श्री. राहुल पिंगळे, श्री. विशाल धातुरे, श्री. कल्याण दळे, श्री. निलेश खैरे तसेच ॲड. योगेश माकणे यांच्यासह विविध क्षेत्रातील ओबीसी समाजातील प्रज्ञावंतांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव श्री. धनराज राठोड यांनी केले.





