*मूल बस स्टँड समोरील अनधिकृत वाहतूक अपघाताला निमंत्रण देणारी असताना सुद्धा सुरूच* *शिवसेना (उबठा) पदाधिकारी यांचे पोलिस, आर्टिओ प्रशासनाला निवेदन*
मूल -मूल शहरातील एसटी बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर मूल मार्गे नागपूरकडे जाणाऱ्या तसेच नागपूरहून मूलमार्गे चंद्रपूर, पोंभूर्णा, चामोर्शी आदी भागात ये-जा करणाऱ्या काही खाजगी प्रवासी वाहनांकडून कथितपणे प्रवासी चढ-उतार व बुकिंग होत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत होत असून भविष्यात हा स्पॉट अपघाताला निमंत्रण देणारच आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनल्याचा आरोप करीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या वतीने संबंधित प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे मूल तालुका प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी (SDPO), पोलिस निरीक्षक, मूल पोलिस स्टेशन, प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) तसेच एसटी आगारप्रमुख यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील मुख्य सेवा रस्त्यावर काही खाजगी प्रवासी वाहने थांबवून प्रवासी भरले जात असल्याने एसटी बसच्या ये-जा मार्गात अडथळा निर्माण होत आहे. या परिसरातून दररोज शेकडो शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक-युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच ग्रामीण भागातील नागरिक प्रवास करीत असल्याने मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच बसस्थानक परिसरातील वाहतूक कोंडीमुळे राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोडवरील वाहतूकही विस्कळीत होत असून, नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधितांवर मोटार वाहन कायदा व इतर लागू नियमांनुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या वतीने बसस्थानक परिसरातील कथित अनधिकृत प्रवासी वाहतूक तात्काळ बंद करणे, वाहतूक पोलिसांचा कायमस्वरुपी बंदोबस्त ठेवणे, आरटीओ, पोलिस विभाग व एसटी प्रशासनाने संयुक्त तपासणी मोहीम राबविणे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कायमस्वरूपी वाहतूक नियोजन करण्याची मागणी करण्यात आली.
“नागरिकांच्या जीविताशी कोणतीही तडजोड होऊ नये. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने ठोस कारवाई करावी; अन्यथा पुढील लोकशाही मार्गाने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख राज ठाकरे, शहर प्रमुख बादल करपे, चेतन मुंगमोळे, रवी शेरकी, राकेश मोहुंरले, आदि शिवसेना कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.




